Weather Alert : राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा

उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ मार्चला गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर, या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे..

राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे बळीराजा आधीच वैतागला आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ मार्चला गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर, या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारत आणि हिमालयीन विभागामध्ये बर्फवृष्टी सुरू असून तेथून महाराष्ट्राच्या दिशेने बाष्प येत आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत ८ आणि ९ मार्चला सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात २ दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून १० मार्चपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण राहणार आहे.

मुंबईतही हलक्या पावसाचा अंदाज

राज्यात हवामान बदलाचा परिणाम मुंबईवरही होणार आहे. मुंबई परिसरातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावसह काही भागांत २ दिवस गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतही सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हे पण वाचा –

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top